जळगाव, (प्रतिनिधी) – जळगाव शहरात एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे.शहरातील मेहरूण तलावाजवळ कारची रेस लावलेल्या एका कारने सायकलीने जाणाऱ्या मुलाला उडविल्याने मुलगा जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक २८ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. विक्रांत मिश्रा असे अपघातमध्ये ठार झालेल्या मुलाचे नाव आहे.
विक्रांत मिश्रा हा आई व वडील यांच्यासह एकनाथ नगर येथे राहत असून तो मेहरून तलावाजवळील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकत होता. आज रविवार २८ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्याचा काकाचा मुलगा सुनील जितेंद्र मिश्रा यांच्यासोबत मेहरून ट्रॅकवर सायकलवर फिरण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याचवेळी मेहरून ट्रॅकवर दोन कार यांची रेस लावण्यात होती. यामधील एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने सायकलवरील विक्रांतला सायकलीसहीत उडविले. हा अपघात एवढा भीषण होता की, विक्रांत हा चेंडूसारखा वर उलाला.. तर त्याची सायकल झाडाला अडकली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जखमीवस्थेत विक्रांतला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. या गुन्ह्यातील कार आणि तीन जणांना एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.