जळागाव : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारला होता. त्यांच्या या बंडाला शिवसेनेच्या ४० आमदारांनी पाठींबा दिला होता. त्यामुळे ठाकरे सरकार कोसळून शिंदे आणि भाजपचे नवीन सरकार स्थापन झाले. एक-एक करत शिवसेनेचे अनेक नेते पदाधिकारी नगरसेवक यांची रीघ लागली शिंदे गटात जाण्यासाठी. हे कार्यकर्ते जात असताना तिकडे ठाकरेंची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत होती. मात्र आता जळगावच्या महापौरांनी एक धक्कादायक आरोप शिंदे गटावर केला आहे. त्यात त्यांच्यावर शिंदे गटात जाण्यासाठी दबाव आणल्याचे तसेच धमक्या दिल्याचेही म्हटले आहे, त्यामुळे हे प्रकरण आता जास्त तापण्याची शक्यता आहे, तसेच शिंदे गटाचीही यावर लवकरच प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
मसेजद्वारे विकासात अडथळे आणण्याच्या धमक्या
जळगावच्या महापौरांनी आरोप करताना म्हटले आहे की शिवसेना सोडून शिंदे गटात येण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे. तसेच शिवसेना सोडून आपल्या गटात आल्यास शहराचा विकास केला जाईल. अन्यथा शहराचा विकास थांबवून अडचणी निर्माण करण्यात येणार असल्याची दुसऱ्या गटाकडून मेसेज द्वारे धमकी आल्याचा सणसणाटी आरोप शिवसेना महापौर जयश्री महाजन यांनी केला आहे. या आरोपांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. मात्र मेसेज द्वारे होत असलेला दबाव आणि धमक्यांना बळी न पडता जळगाव शहराची निष्ठा व नागरिकांचा विश्वास हा महत्त्वाचा असल्याने या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नसल्याचे महापौर जयश्री महाजन यांनी स्पष्ट केले आहे.
पुन्हा राजकारण ढवळून निघणार
त्यानंतर ही बराच राजकीय वादंग माजला होता. तसेच अनेक आमदारांना, खासदारांना ईडी आणि सीबीआयच्या धमक्या देऊन आपल्या गटात सामील केले जात असल्याचा आरोप ही ठाकरे गटातील नेत्यांकडून वारंवार करण्यात येत आहे. त्यातच आता जयश्री महाजन यांनी असे खळबळजनक आरोप केले असल्याने पुन्हा एकदा राजकीय वादंग माजण्याची दाट शक्यता आहे. जयश्री महाजन यांचे हे आरोप किती खरे आणि किती खोटे हे तर चौकशी अंती स्पष्ट होईल, मात्र पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.