मुंबई : यंदा मार्च महिन्यापासून तापमानाचा पारा ४० अंशावर गेला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात तापमानाच्या पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. सोबतच या दोन महिन्यात राज्यात उष्माघातामुळं तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला असून त्यात जळगाव जिल्ह्यातील ४ जणांचा समावेश आहे. राज्यात उष्माघाताच्या बळींची गेल्या आठ वर्षांतील ही उच्चांकी नोंद आहे.
त्यात राज्याची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात (Nagpur) उष्माघातामुळं सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. एप्रिल महिन्यात नागपूरमध्ये उष्माघाताने 9 लोकांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात नागपूरमध्ये उष्माघाताने 9 लोकांचा मृत्यू झाला. 2 ते 4 एप्रिल दरम्यान ही मृत्यू संख्या दोन होती. 16 एप्रिलपर्यंत ही संख्या वाढून 4 झाली. मात्र मागच्या दोन आठवड्यात उन्हाचा तडाखा आणखी वाढला. एप्रिल महिना संपेपर्यंत उष्माघाताच्या एकूण मृतांचा आकडा 9 वर पोहोचला आहे. मे महिन्यात उन्हाचा तडाखा आणखी वाढणार असल्यानं नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे.
राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे यंदा मार्च ते एप्रिल या दोन महिन्यांत राज्यात 25 जणांचा उष्माघातानं मृत्यू झाला. तर जवळपास 374 जणांना उष्माघाताची बाधा झाली आहे. त्यात सर्वाधिक सुमारे 44 टक्के मृत्यू नागपुरमध्ये झालेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्यांना पत्र
भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि NCDC द्वारे राज्यांसह सामायिक केल्या जाणार्या दैनंदिन उष्णतेच्या सूचनांवरुन पुढील 3-ते 4दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. IDSP चा हा दैनंदिन देखरेख अहवाल राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) सोबत शेअर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यांचे आरोग्य विभाग, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि तळागाळातील कामगारांना उष्णतेबद्दल संवेदनशील बनवावे लागणार आहे, तसंच त्यांची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरु ठेवावे लागतील असंही केंद्रीय आरोग्य सचिव भूषण यांनी राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.