नवी दिल्ली : कोळशाच्या तुटवड्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये विजेचे संकट निर्माण झाले आहे. एकीकडे औष्णिक वीज केंद्रांवर कोळशाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकार अनेक पावले उचलत असताना दुसरीकडे कोळशाने भरलेली मालगाडी उलटून मोठा अपघात झाला आहे. उत्तरप्रदेशमधील इटावा जिल्ह्यातील डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवर हा अपघात झाला. यामुळे या मार्गावरील राज्यांना कोळशाची टंचाई आणखी तीव्र जाणवण्याची शक्यता आहे.
ही मालगाडी कानपूरहून दिल्लीला जात होती. यावेळी न्यू इकदिल स्टेशनजवळ सकाळी ही मालगाडी घसरली आणि १२ वॅगन पलटल्या. त्यातील कोळसा बाहेर पडला आहे. मालगाडीच्या वॅगन बाजुला काढून विखुरलेला कोळसा देखील बाजुला काढावा लागणार आहे. तसेच रेल्वेचा ट्रॅकही उखडला आहे. यामुळे या मार्गावरून वाहतूक सुरु करण्यासाठी रेल्वेला मोठा काळ लागणार आहे.
देशभरात विविध ठिकाणी कोळशाचा पुरवठा वेगाने करण्यासाठी रेल्वेने ६०० हून अधिक पॅसेंजर ट्रेन रद्द केल्या होत्या. तसेच खास मालगाड्यांसाठी रेल्वे ट्रॅक वापरण्यात येत आहेत. ही मालगाडी वेगाने या मार्गावरून जात होती. या मालगाडीचे एक चाक कित्येक किमी आधीपासून आवाज करत होते. या ठिकाणी ते चाक असलेली वॅगन घसरली आणि पाठोपाठ असलेली वॅगन एकमेकांवर आदळून अपघात झाला. इंजिनासोबत काही वॅगन पुढे गेल्या. मालगाडी दोन भागात तुटली. अधिकारी घटनास्थळी गेले असून अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.
डीएफसी मार्गावरील पहिला अपघात नाही. गेल्या वर्षी ऑगस्टमध्येही मालगाडी रुळावरून घसरली होती. इटावापासून 25 किमी अंतरावर असलेल्या जसवंतनगर आणि बलराई दरम्यान खुर्जाहून कानपूरला जाणाऱ्या मालगाडीच्या 17 खुल्या वॅगन रुळावरून घसरल्या आणि काही उलटल्या. या अपघातात अर्धा किमी रेल्वे मार्ग उखडला गेला होता. अनेक दिवसांनी पुन्हा ट्रॅक कार्यरत झाला होता.