मुंबई : एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरून गेल्या चार महिन्यापासून संपावर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. विलीनीकरण शक्य नाही, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. शेकडो कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून बसलेले आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असल्या तरी, विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी कायम आहेत. या मुद्द्यावर न्यायालयीन लढाई सुरू होती. याबाबत त्रिसदस्यीय समिती देखील स्थापन करण्यात आली होती.
या समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला. एसटी महामंडळाचं विलीनीकरण शक्य नाही, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळं संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरी अखेर निराशा पडली आहे.