मुंबई : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी विधानसभेत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली. धान उत्पादकांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावेळी त्यांनी 600 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याऐवजी डायरेक्ट खात्यात हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून देण्याबाबत राज्य सरकार विचारधीन असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
विधानसभेत विरोधी पक्षाने धान उत्पादकांचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी धानाला बोनस द्यावा, अशी मागणी केली. कारण छोट्या शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. सर्वच मागणी करत आहेत. यावेळी अजित पवार यांनी धान उत्पादनकांना बोनस आम्ही देणार नाही. कारण ती मदत शेतकऱ्यांना पोहोचत नाही. दलाल त्यात पैसे घेतात. एकरमागे काही मदत द्यायचा प्रयत्न आम्ही करु, असे सांगत 600 कोटी रूपये पॅकेज देवू पण बोनस नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यात मोबाईलवरून ई-पीक पाहणी नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली गेली आहे. आता 31 मार्चपर्यंत पीक पहाणी नोंदवता येणार आहे. मात्र त्यानंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही. कारण बहुतेक भागात पिकांची कापणी सुरु झाली. नोंदणीत अडचण असल्यास तलाठ्याशी संपर्क साधण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.