जळगाव ! आमच्यामुळे जनतेचे मनोरंजन होत नाहीये, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या कृत्यामुळेच जनतेची झोप उडाली आहे. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये महाविकास आघाडी सरकारचे अनेक मंत्री अडकले आहेत, अडकत आहेत, अशा जोरदार शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे.
तसेच भाजपचे माजी नेते आणि सध्या ‘राष्ट्रवादी’मय झालेले एकनाथराव खडसे यांनाही चिमटे काढत सल्ला दिला! एकनाथ खडसे यांना त्यांनी काही पथ्ये पाळावीत म्हणून सबुरीचा सल्ला दिला. पाटील जळगावमध्ये गिरीश महाजन यांच्या मुलीच्या लग्नासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला
चंद्रकांत पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे हे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले असले, तरी त्यांच्याबद्दल आजही आमच्या मनात आदर आहे. भाजपमध्ये असताना जे मिळत होतं, त्यावर समाधान मानून खडसेंनी पदरात पाडून घ्यायला होतं. पक्षाचे नुकसान न करता पुढे जायला हवे होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. ते जरी आमच्यावर आरोप – प्रत्यारोप, टीका-टिपण्णी करत असतील, तर आम्ही मात्र तसे करणार आहे. त्यांनी पथ्ये पाळली पाहिजेत. बाकी ते जेष्ठ नेते आहेत. योग्य काय ते ठरवतील.