मुंबई : गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाचे संकट आल्याने राज्यातील तापमानात काहीशी घट झाली होती. मात्र, राज्यात आता तापमानाचा पारा वाढू लागला आहे. पुढील दोन दिवसात मुंबईसह राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे आणि त्यानंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर (K. S. Hosaliakr) यांनी यासंबंधी एक ट्विट केलं आहे.
होसाळीकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, येत्या 2 दिवसांसाठी मुंबईचे कमाल तापमान 39°C राहील आणि त्यानंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता, असल्याचं IMD नं सांगितलं आहे.” पुढे ते म्हणाले की, “कृपया घाबरू नका पण काळजी घ्या. किनारपट्टीच्या भागासाठी उष्णतेच्या लाटेचा निकष: कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 4.5°C वर आणि कमाल तापमान किमान 37°C असावं.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह, राज्यातील पुणे, कोकण, मराठवाडा-विदर्भातही उष्ण तापमान असेल, अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. या तापमानामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी शरीराच्या पाणी पातळीत वाढ करावी आणि काळजी घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्यात.