मुंबई, (प्रतिनिधी) – ठाणे जिल्ह्यातील, भिवंडी ग्रामीण भागात नाईट कॉलेज या नावाने प्रचलित असलेले “आसरा आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज” च्या भोंगळ कारभारातून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फसवणुकीबाबत आज दि.18 रोजी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे कार्याध्यक्ष ॲड.सुनिल देवरे यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
दरम्यान मासुचे , कार्याध्यक्ष ॲड सुनिल देवरे, उपाध्यक्ष ॲड.प्रशांत जाधव, ठाणे जिल्हा अध्यक्ष परेश चौधरी आणि मुंबई अध्यक्षा ॲड.स्नेहल निकाळे यांच्या सह इतर पदाधिकारी व बाधित विद्यार्थी यांनी विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर पुरानीक यांची भेट घेऊन सदरील कॉलेजवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
प्रथम वर्षातीलच प्रवेश निश्चित नसतांना, प्रथम वर्षातून दुसऱ्या वर्षात आणि दुसऱ्या वर्षातून तिसऱ्या वर्षात विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांना कसे पाठवण्यात आले? असा जाब या तक्रारीच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे.यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे अमूल्य असलेले शैक्षणिक वर्ष वाया गेले, यावर कठोर कारवाई करावी आणि अशा घोटाळेबाज कॉलेज ची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी यावेळी मुंबई विद्यापीठाला देण्यात निवेदनात करण्यात आली आहे.