भुसावळ : भुसावळमध्ये भाजपला मोठे खिंडार पडले आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज २१ नगरसेवकांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे.
गेल्या वर्षी भाजपाला सोडत ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनतर खडसेंनी भाजपला धक्का देत जळगाव महानगरपालिकेत पारडे फिरवले, त्यानंतर भुसावळमध्येही खडसेंनी भाजपला मोठे खिंडार पाडले आहे. भुसावळमध्ये भाजपला एकनाथ खडसे यांनी खिंडार पाडताना तब्बल 21 नगरसेवकांना राष्ट्रवादीत आणले आहे. राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या सर्व नगरसेवाकांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे.
दरम्यान, यावेळी अजित पवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. जळगाव जिल्ह्यातील सोन्याची किंमत सर्वांनाच कळते असे नाही, एकनाथ खडसे यांनी 40 वर्षे भाजपसाठी काम केले, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत येण्याने आनंद झाला, आता जळगाव जिल्हा राष्ट्रवादीमय करायचा आहे, असे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात एकनाथ खडसे यांच्या हस्ते विविध मागण्यांचे आणि संघटनेचे एकत्रित निवेदन अजित पवार यांच्याकडे दिले.