चाळीसगाव प्रतिनिधी : तालुक्यातील हिरापूर गावाजवळ क्रूझर गाडी पलटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना रात्री १० ला घडली आहे. या अपघातात तीन जण ठार तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींमधील तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
एमएच १३-एसी-५६०४ या क्रमांकाच्या क्रूझर वाहनातून मनमाड येथून १२ मजूर हे पाचोरा येथे जात होते. हे सर्व रेल्वेत कंत्राटी काम करणारे मजूर होते. ते काम आटोपून घरी जात असतांना रात्री आठच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर जवळ त्यांचे क्रूझर वाहन अचानक उलटले. वाहकाचे क्रूझरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
या अपघातात नाना भास्कर कोळी, विकास जलाल तडवी व मुक्तार तडवी तिघे रा.डोंगरगाव अशी अपघात ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. जखमींमध्ये विनोस तडवी (३५), चंदन हरीश पाटील (२७), माधान नारायण पाटील (३०),नितीन बाळू पाटील ( २६), दिलीप शबिर तडवी (३५), समीर राजू तडवी (२३), स्वराज्य (स्वप्नील पाटील) आदींचा समावेश आहे.
जखमींवर चाळीसगावातील शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाऊस व अंधार असल्यामुळे मदत कार्याला अडथळा निर्माण झाला. परंतु आमदार मंगेश चव्हाण व कार्यकर्त्यांनी तातडीने मदत करून रुग्णांना रुग्णालयात दाखल केले. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत चाळीसगाव पोलीस स्टेशनला कुठल्याही प्रकारची नोंद नव्हती .