जळगाव : गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून किरकोळ, तर कधी मोठा चढ-उतार होत असलेल्या चांदीच्या भावात शुक्रवारी (दि.१७) पुन्हा मोठी घसरण झाली. शुक्रवार चांदीच्या भावात थेट दोन हजार रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे चांदी ६२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली. गेल्या आठ महिन्यातील हे सर्वात कमी भाव आहेत. सोन्याच्याही भावात ५५० रुपयांची घसरण होऊन ते ४७ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले.
यामध्ये दोन आठवड्यांपूर्वी ६६ हजारांच्या पुढे असलेल्या चांदीच्या भावात एक हजाराने घसरण होऊन ती गेल्या आठवड्यात ६५ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली होती.
तेव्हापासून त्याच भावावर स्थिर असलेल्या चांदीच्या भावात पुन्हा एक हजाराने घसरण होऊन ती गुरुवार, १६ सप्टेंबर रोजी ६४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली होती. त्यानंतर आता शुक्रवारी पुन्हा दोन हजार रुपयांची घसरण होऊन चांदी ६२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीची मागणी कमी झाल्याने व भारतीय शेअर बाजारातील वाढीचा परिणाम होऊन सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे.