मुंबई – पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करावी व वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे 3 मार्च रोजी राज्यव्यापी “नगाडा बजाव आंदोलन” करण्यात येणार असल्याची घोषणा, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
श्री . पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे की, आतापर्यंत विविध माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या बारा ऑडिओ क्लिप मध्ये राठोड यांच्या विरोधात अनेक प्रथमदर्शनी पुरावे आढळले असूनही संजय राठोड यांना अभय दिले गेले आहे. या प्रकरणातच नव्हे तर आघाडी सरकारच्या काळात सत्ताधारी पक्षाचे अनेक पदाधिकारी व मंत्री यांची नावे महिला अत्याचार विषयात समोर आलेली असतानाही सरकार फक्त बघ्याची भूमिका घेऊन त्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे.
झोपेचे सोंग घेतलेल्या या ‘कुंभकर्ण रुपी’ सरकारला जागे करण्यासाठी युवा मोर्चा च्या वतीने राज्यभरात “नगाडा बजाव” आंदोलन केले जाणार आहे.ऑडिओ क्लिप मध्ये ज्यांची नावे आली आहेत असे सर्वजण अजून मोकाट आहेत, त्यामुळे या प्रकरणातील पुरावे नष्ट होण्याची मोठी भीती आहे. त्यामुळे ज्यांची नावे आली आहेत अशांना पोलिसांनी ताब्यात घ्यावे , असेही श्री . पाटील यांनी पत्रकात नमूद केले आहे.